महातीर्थाचा अखेरचा यात्रिक mahatirthacha akheracha yantantrik

#महातीर्थाचा_अखेरचा_यांत्रिक
काही पुस्तकं अक्षरशः आपल्याशी बोलतात, आणि आपलं मन त्यांच्या भूतकाळातील वास्तविक दुनियेत रमू लागतं. मग आपसूकच नवे संकल्प मनात फेर धरू लागतात. ते पूर्णत्वास नेण्यास मन धावू लागते.

मन सागरात लाटा 
त्यांच्या अगणित वाटा
किनाऱ्यास धडक ठरलेली
देहाच्या झिजती टाचा

आयुष्यात प्रवास कुणालाच चुकत नाही. जीवन क्षणभंगुर असलं, तरी मरेपर्यंत सर्वानाच प्रवास करावा लागतो. आणि प्रवास म्हंटला की त्याची सुरवात अगदी छोट्या पाऊलापासून सुरू होते. त्या अनुभवातून माणूस समृद्ध होऊ लागतो. त्याला एक नवी दिशा मिळते आणि त्याची दशा बदलत जाते. माणूस नवनवीन प्रवास करून माघारी फिरतो, तेव्हा तो पूर्वीसारखा निश्चितच राहत नाही. म्हणूनच मला, नव्हे प्रत्येकालाच प्रवासाची ओढ असते. पण माझा प्रवास आणि माझा आवाका तो किती ? प्रश्नचिन्ह आहे. आपल्यासमोर अनेक जीवनप्रवासाचे आदर्श प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे पुस्तकरुपात आहेत. त्यातीलच एक पुस्तक "महातीर्थाचा अखेरचा यांत्रिक".

या पुस्तकाबद्दलच म्हणायचं झालं तर... कैलास मानसरोवरबद्दल अत्युच्च कोटींची श्रद्धा, भक्ती पुराणकाळापासून कित्येकांच्या मनात वसलेली आहे. परंतु कुठलीही आध्यात्मिक ओढ नसताना, १९५६ मध्ये, भारतीयांना चीनने व्याप्त केलेल्या तिबेटमध्ये जाण्यास परवाने मिळत नसतानाही, एका भटक्या बंगाली युवकाने हा प्रवास पायी केला.

भारतातील पश्चिम बंगाल, कलकत्त्यामधील इच्छापूर येथे जन्मलेल्या, "बिमल डे" यांनी विश्वपर्यटनाची सुरवात १९६७ मध्ये केली. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि आस्ट्रेलिया हे खंड फिरून ते १९७२ साली मायभूमी भारतात परतले. सायकलवरून त्यांनी २३० हजार किलोमीटर यात्रा केली. त्यांच्या आयुष्यातील प्रथम भुयात्रेची सुरवात त्यांनी नकळत वयाच्या पंधराव्या वर्षी केली. त्याच पहिल्या प्रवासी (अद्भुत, अलंकारिक, आध्यात्मिक, तांत्रिक, मांत्रिक, नैसर्गिक, खडतर आणि चमत्कारिक) अनुभवांना त्यांनी या पुस्तकात शब्दरूप दिले आहे. हा जरी प्रवासी अनुभव असला तरी पुस्तक वाचल्यावर लक्षात येते की हा आत्मशोध आहे. बिमल डे तर या पुस्तकाला "भिकाऱ्याची डायरी" असे म्हणतात.

आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना गावात चैन नाही, शाळेत अर्थ वाटत नव्हता, म्हणून घरातून पळ काढला. खिशात पैसे होते तोवर वाटेत चणे फुटाणे खात खात बिहारमधील गया येथे येऊन पोहोचले. तिथे रस्त्याच्या कडेला पडलेल्या एक साधुबाबाची दया आली, त्यांची सेवाशुश्रूषा केली. त्यांनी घरी जायला सांगितले ती आज्ञा पाळली नाही. त्यांनी झिडकारले तरी त्यांचा हात सोडला नाही. एके दिवशी अचानक साधुबाब गँगटोकला निघून गेले. यांना काही चैन पडेना, शेवटी बरेच अंतर पायी तर काही अंतर गाडीने गँगटोक गाठले. साधुबाबाचा शोध घेतलाच . इथूनच खरी त्यांच्या प्रवासाची सुरवात झाली.

सत्तर वर्षाच्या एका बौद्ध भिक्षु (साधुबाबा) च्या मदतीने, अट्टाहास करून, नेपाळच्या प्रवास परवाना पत्रावर, नाथुलापास पार करून गियात्से - सामदिंग - चाकसाम - द्रेपुंग - ल्हासा असा खडतर प्रवास केला. वाटेत चिनी सैनिकांच्या चौकशीला सामोरे जात, वाटेत येणाऱ्या मठांत आश्रय घेतला. विश्रांती घेत ३२ दिवसात अनेक अवघड पर्वत ओलांडून, हिमालयातील नैसर्गिक हवामानाशी, असह्य थंडीशी जुळवून घेत, तीस लामा आणि साधुबाबा यांच्या सोबत २७७ किमी अंतर पार करून ल्हासाला पोहचले. तेथून सर्वांसोबत शिगास्तेला पोहचले. बौद्ध धर्माची त्यांना दीक्षा दिली गेली.

माघारी फिरताना साधुबाबा कैलास मानसरोवराबद्दल जाण्याची ईच्छा असतानाही, चिनी सैनिकांच्या परवानगीशिवाय पुढे जाता येणार नाही. एवढ्या दूरपर्यंत येऊनही लामांच्या यात्रेकरू जथ्याला कैलास मानसरोवराची यात्रा करता येणार नाही याची खंत व्यक्त करतात. बिमल साधुबाबाला कैलासाचा रस्ता विचारतात. त्यावर ते म्हणतात, "रस्ता अवघड आहे, पण सरळ आहे. ब्राह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने तिच्या उगमापर्यंत गेल्यास मानसरोवर, कैलासाला जाता येते. ते हिंदूंची शिवभूमी आणि महातीर्थ आहे. हे ऐकून चंचल बिमल जागृत होतात. बाबा पुढे म्हणतात, सोबतच परतीचा प्रवास एकत्र नाही तर गटा-गटाने, टप्प्या-टप्प्याने करावा लागेल. हे सांगून ते माघारी फिरतात.

बिमलच्या मनास कैलासाचे डोहाळे लागलेले असतात. सर्वांशेवट राहून अखेरीस तिबेटी-चिनी भाषा फारसी येत नसतांना, सोबत परवाना नसताना, वाट माहीत नसताना, एकटेच ब्राह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने वरच्या दिशेने चालू लागतात. आंतरमनातून आलेल्या आवाजाने प्रवासाची सुरवात केली तरी, देहाचे अवसान मात्र गळले होते. दुर्गम हिमालयाच्या अंगाखांद्यावरून वाट काढत, एकट्याने ल्हासा ते मानसरोवर, कैलास पर्वत ही यात्रा पूर्ण केली, हा चमत्कारच आहे. वाटेत ज्यावेळेला त्यांना खरी मदतीची गरज होती तेव्हा निर्जन ठिकाणी चमत्कारिक काही घटना घडल्या हे अद्भुत आहे. हा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. ब्राह्मपुत्रेच्या उगमस्थानापर्यंत वाटेत अनेक भयानक, अद्भुत, अलौकिक अश्या गोष्टींचा अनुभव घेत शिगात्से - पासागुक - त्रादुम - थोकचेन असा १२८५ किमीचा प्रवास करत मानसरोवर, कैलासनाथ येथे पोहचतात.

देह करी जे जे काही आत्मा भोगीतो नंतर
पण इथे म्हणावेसे वाटते...
आत्मा करी जे जे काही देह भोगाया तत्पर

कैलासाचे दर्शन झाल्यानंतर परत माघारी फिरताना, चिनी छावणी असलेल्या लिपू लेकला बगल देऊन, उभा महाकाय बर्फाच्छादित पर्वत चढून भारतीय हद्दीत ते पोहचतात. येथे ओळख पटल्यानंतर भारतीय सैनिक त्याचे खूप कौतुक करतात. तेथून दौली-गंगा, दरचुला, बेरिनागहून आलमोडा मार्गे नैनितालहून काठगोदामला येऊन कलकत्त्याकडे रवाना होतात. कैलास ते आलमोडा हा प्रवास ३९२ किमी आहे.

या सर्व खडतर प्रवासादरम्यान लेखकाला आलेले अनुभव, अनुभूती, प्रचिती त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. हे पुस्तक वाचल्यावर मनात काही संकल्प निर्माण झाले. ते पूर्णत्वास नेण्याकडे आता नक्कीच प्रयत्न राहील.

या पुस्तकाचा मराठीत अनुवाद "विजय हरिपंत शिंदे" यांनी केलाय. तर प्रकाशन "पद्मगंधा प्रकाशन"ने केले आहे.
संदर्भ :- महातीर्थाचा अखेरचा यांत्रिक (बिमल डे)
____नित
नितेश पाटील




Comments

Popular posts from this blog

हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम